सुरु ऊस
पिकाची पाण्याची गरज ही वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, हंगाम यावर अवलंबून असते. जास्त पाणी दिल्यास जमीन क्षारपड होण्याची शक्यता असते. वाढीच्या सुरवातीच्या काळात पाण्याची गरज कमी असते. मात्र बांधणीनंतर जास्त पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे वाढीच्या अवस्थेत हिवाळ्यात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) १८ ते २० दिवसांनी, उन्हाळयात (मार्च ते जून) ८ ते १० दिवसांनी आणि पावसाळयात (जुलै ते ऑक्टोंबर) १२ ते १५ दिवसांनी पाणी द्यावे. सुरु उसास साधारणपणे २८ ते ३० पाळ्या (२५० ते २७५ हे.सें.मी.) द्याव्या लागतात. उगवण होताना ६ सें.मी., फुटवा ते पूर्ववाढीच्या अवस्थेमध्ये साधारणपणे ८-१० सें.मी. (वरंब्यांच्या अर्ध्या उंचीपर्यंत) पाणी द्यावे. बांधणीनंतर जोमदार वाढीच्या काळात १०-१२ सें.मी. (वरंब्याच्या २/३ उंचीपर्यंत) आणि पक्वता कालावधीमध्ये ७-८ सें.मी. पाणी एका पाळीस द्यावे.