कांदा-लसूण
💧पाणी व्यवस्थापन
पाण्याचे प्रमाण आणि दोन पाळ्यांतील अंतर हे पिकाची वाढीची अवस्था, लागवडीचा हंगाम, जमिनीचा मगदूर इत्यादींवर अवलंबून असते. पिकाला पाणी देताना १५ सें.मी. पेक्षा जास्त खोलवर ओल जाईल, असे पाणी देण्याची गरज नाही. रोपांची चांगली वाढ होण्याकरिता पुनर्लागवडीवेळी व त्यानंतर तीन दिवसांनी पाणी द्यावे. सुरुवातीच्या काळात पिकाला बेताचे पाणी लागते. पिकाच्या वाढीबरोबर पाण्याची गरज वाढते. खरीप कांद्यास क्वचितच पाणी देण्याची गरज पडते. पावसात खंड पडला तर ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे एक-दोनवेळा पाणी द्यावे. पाणी देण्याच्या ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत, कांद्यांची एकसमान वाढ, मजुरीच्या खर्चात कपात, रोपांची चांगली रुजवण असे अनेक फायदे आढळून येतात. कांद्यांची वाढ पूर्ण होऊन पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर काढणीपूर्वी १५ ते २० दिवस आधी पाणी देणे बंद करावे. त्यामुळे कांदा पक्व होण्यास मदत होते.