हरभरा
- पाणी व्यवस्थापन
- जिरायती हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.
- बागायत हरभरा शेताची रानबाधंणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबीसुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते.
- हरभरा पिकास मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळया पुरेशा होतात. त्याकरिता ३० ते ३५ दिवसांनी पहिले व ६० ते ६५ दिवसांनी दुसरे पाणी दयावे.
- हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सें.मी. पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ सें.मी.) देणे महत्वाचे असते.
- स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. भेगा पडलेल्या शेतात पाणी दिल्यास जास्त पाणी बसून, चांगले पीक उभळण्याचा धोका असतो. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.
हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते. - | शेळी पालन | शेळी-मेंढीमधील मावा आजार माहिती व उपाय
रब्बी मका
मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक असते. मका पीक पाण्याच्या ताणास संपूर्ण कालावधीमध्ये संवेदनशील आहे. पेरणी केल्यानंतर लगेच पाणी द्यावे. पिकाची शाकीय अवस्था (पेरणीनंतर २० ते ४० दिवस), पीक फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ४० ते ६० दिवस), दाणे भरण्याच्या वेळेस (पेरणीनंतर ७० ते ८० दिवस) या संवेदनशील अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडू देऊ नये, अन्यथा उत्पादनात लक्षणीय घट येते. पीक फुलोऱ्यात आणि दाणे भरत असताना कमी अंतराने भरपूर पाणी द्यावे. म्हणजे कणसे भरण्यास मदत होते. मका फुलोऱ्यात असताना जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी असल्यास स्त्रीकेसर बाहेर पडण्यास उशीर झाल्यामुळे बीजधारणा कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पीक तुऱ्यावर आणि स्त्रीकेसर अवस्थेत असताना पाण्याची आवश्यकता अधिक असते. रब्बी हंगामामध्ये १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.