टोमॅटो
![]() |
टोमॅटोची लागवड महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत यशस्वीरीत्या केली जाते. अपेक्षित उत्पादनासाठी योग्य जातींची निवड, त्यांची योग्य पुनर्लागवड यासोबतच रोप व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आवश्यक आहे. रब्बी हंगामासाठी बी पेरणीचा कालावधी सप्टेंबर-ऑक्टोबर असून ऑक्टोबर ते नोव्हेंबर कालावधीत रोपांची पुनर्लागवड करावी. एक एकर क्षेत्रासाठी १.२ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी. टोमॅटोच्या संकरीत वाणांसाठी ५० ग्रॅम बियाणे एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे असते. रोपवाटिकेची जमीन २ वेळा उभी-आडवी नांगरावी व कुळवून घ्यावी. ३ मी x १ मी x १५ सेंमी आकाराचे गादी वाफे तयार करावेत. गादीवाफ्यामध्ये ५ किलो कुजलेले शेणखत, ८० ग्रॅम १९:१९:१९ किंवा १०० ग्रॅम १५:१५:१५ चांगले एकसारखे मिसळावे. बीजप्रक्रिया करण्यासाठी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रतिकिलो आणि त्यानंतर जीवाणू संवर्धन व पीएसबी २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे, त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कुज हे रोग नियंत्रणात राहतात. त्यानंतर हाताने १० सेंमी अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये १ सेंमी अंतरावर एक एक बी पेरावे. झारीने हलकेच पाणी द्यावे. त्यानंतर गादीवाफे आच्छादनाने झाकून घ्यावेत. साधारणपणे ५ ते ८ दिवसांत बी उगवते. बी उगवल्यावर आच्छादन काढून टाकावे.
कोबी वर्गीय पिके :-
कोबीवर्गीय भाजीपाला पिकांच्या पुनर्लागवडीनंतर गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या करून माती भुसभुशीत आणि पीक तणविरहित ठेवावे. कोबीवर्गीय पिकांची मुळे उथळ असल्यामुळे खोलवर खुरपणी किंवा खांदणी करू नये. गड्डा धरू लागल्यानंतर रोपांना भर द्यावी. त्यामुळे गड्ड्याच्या ओझ्याने रोपे कोलमडणार नाहीत.
वेल वर्गीय पिके
वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काळा करपा, केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड (५० डब्ल्यू.पी.) २.५ ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झिल + मॅंकोझेब संयुक्त बुरशीनाशक (७२ डब्ल्यू.पी.) २.५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल (८० डब्ल्यू.पी.) २ ग्रॅम अधिक मॅंकोझेब २ ग्रॅम (टँक मिक्स) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी करावी.
कांदा
रोपवाटिकेत सिंचन पाटाने पाणी देताना- बी पेरल्यानंतर शक्यतो पहिले पाणी झारीने द्यावे. वाफ्यांचे प्रमाण जास्त असल्यास, झारीने पाणी देणे जिकिरीचे असल्यास पाटाने पाणी द्यावे. मात्र, पाण्याचा प्रवाह वाफ्याच्या तोंडाशी गवताची पेंढी ठेवून कमी करावा. पहिल्या पाण्यानंतर रोप उगवत असताना लगेच हलके पाणी द्यावे. त्यामुळे उगवण सुलभ होते. त्यानंतर पाणी बेताने आणि हवामानानुसार ७-८ दिवसांच्या अंतराने द्यावे. ठिबक, तुषार सिंचन - ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार करण्यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने १ मीटर रुंद, ६० मीटर लांब आणि १५ सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत. त्यावर ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरल ६० सेंमी अंतरावर ओढून घ्याव्यात. लॅटरला ३० ते ४० सेंमी अंतरावर ड्रीपर्स असावेत. तुषार सिंचनासाठी दोन नोझलमध्ये ३ मी x ३ मी अंतर ठेवावे. वाफ्यावर रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर रेघा पाडून त्यात बियाणे पेरावे. ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार केली तर एकरी २ किलो बियाणे पुरते. नेहमीच्या पद्धतीमध्ये ३.५ किलो बी लागते. याशिवाय पाण्यातदेखील ४० टक्के बचत होते. बियाण्यास कोंब येईपर्यंत मातीच्या वरच्या थरात ओलावा राहील याची खबरदारी बाळगावी. रोपवाटिकेतील वाफ्यांमध्ये बियाण्यास कोंब येईपर्यंत सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस पाणी द्यावे. पुनर्लागणीच्या अगोदर पाणी कमी-कमी करावे, दोन पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर वाढवावे, त्यामुळे रोपे काटक बनतात. मात्र रोपे उपटण्यापूर्वी २४ तास अगोदर पाणी द्यावे. त्यामुळे रोप काढणे सोपे होते.
कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा

कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
